
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले असून, परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब यांच्या बाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. यावेळी रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी आणि त्यांची देखील ईडीची चौकशी लावावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती, हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बे हिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर केली होती. सोमय्या यांना दिलेली सर्व माहिती प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागवून ती माहिती रामदासभाई कदम यांनी त्यांचे मित्र भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे दिली. सोमय्या हे खरोखर भ्रष्टचाराविरोधात लढत असतील तर त्यांनी रामदास भाईंची देखील ईडीची चौकशी लावावी आपले त्यांना आवाहन आहे असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
आपल्या अपात्रतेसाठी रामदासभाई कदम गेली अनेक महिने प्रयत्नात
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते रामदासभाई कदम हे पुत्र प्रेमापोटी आंधळे झाले आहेत. खेड शहरातली जनता आपल्यावर आणि पर्यायाने मनसेवर विश्वास ठेऊन आहे. गेली कित्तेक वर्ष खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे. हे रामदासभाईंना पाहवत नाही. आपल्या पुत्राचा राजकीय प्रवास सुरळीत होण्यासाठी ते हात धुवून आपल्यामागे लागले असल्याचे वैभव खेडेकर म्हणाले, प्रसाद कर्वे हा रामदासभाईंचा खास माणूस आहे, त्यांचा पर्सनल पीए म्हणून देखील काम करत आहेत त्यांच्या करावी खेड नागरपालिकेतून माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवून अर्धवट माहितीच्या अधिकाराखाली अधिकाऱ्यांवर व नगरसेवकांवर दबाव टाकत आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा विडा उचलला आहे.

आपल्या अपात्रतेची कारवाईसाठी रामदास कदम यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव
शिवसेनेच्या नगरसेवकांवर रामदास कदम यांनी दबाव टाकून माझ्या विरोधात तक्रारींच्या प्रस्तावावर सह्या करण्यास त्यांना भाग पाडले असले तरी मला अपात्र करण्याचा कट मी उलथवून टाकेन. मुंबई उच्च न्यायालयाने मला बाजू मांडण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली असून न्यायालयासमोर आम्ही माझ्या विरोधातील तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेत रामदास कदम यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे पुरावे दिले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि १८ रोजी पालिकेच्या नगराध्यक्ष कक्षात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कक्षात शनिवारी दि १८ रोजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, वैभव खेडेकरांचे पद जाणार आशा काही लोकांनी भीष्मप्रतिज्ञा केल्या. यंत्रणेला हाताशी धरून माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचण्यात आले. मात्र मी आता त्यांचा डाव उलथवून टाकला आहे. ज्यांच्या सह्यानी माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या त्यांनी खासगीत मला भेटून आम्ही रामदास कदम यांच्या दबावाखाली सह्या केल्याचे सांगितले आहे. माझ्या विरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली व रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे श्री खेडेकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी कायद्याच्या कक्षेत करण्यात आलेली नाही. चौकशी प्रक्रिया बेकायदेशीरपणे आठ महिने चालवण्यात आली. ही चौकशी सुरू असताना अनेक वेळा या प्रक्रियेत कोणताही संबंध नसताना रामदास कदम यांनी सातत्याने पत्र पाठवून हस्तक्षेप केला आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्यानेच मी या बेकायदेशीर चौकशी प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. दि १५ व १६ रोजी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने आता मला नगरविकास विभागाकडून देण्यात आलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत आणखी पंधरा दिवस वाढ केली आहे. तसेच यापुढे नगरविकास विभागाकडून माझ्या प्रकरणी होणाऱ्या पुढील करवाईकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. उच्च न्यायालया समोर आम्ही माझी चौकशी कशी बेकायदेशीर झाली आहे व त्यामध्ये झालेला राजकीय हस्तक्षेप यांचे पुरावे दिले आहेत. रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे. मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या विरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचाह कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत मी केलेल्या कामामुळे व विकास कामे यामुळे जनता माझ्या सोबत आहे. दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.






































































