

कोकणातील भजनी परंपरा, वारकरी संप्रदाय आणि सांस्कृतिक वारशाची खरी ओळख व्यापक पातळीवर पोहोचवण्याचे कार्य संतोष कानडे सातत्याने करत आहेत. भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत कलाकारांना सरकारशी जोडणारा सशक्त दुवा निर्माण केला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचा गौरव केला.

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नितेश राणे बोलत होते. त्यांनी सांगितले की, संतोष कानडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन परंपरा जपण्यासाठी आणि भजनी कलाकारांना शासनमान्यता तसेच विविध योजना मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक अधिवेशनात त्यांनी कलाकारांच्या समस्या, मागण्या आणि अडचणी प्रभावीपणे मांडल्या असून, असे एकही अधिवेशन नाही की त्यांनी कलाकारांचे प्रश्न सरकारसमोर उपस्थित केले नाहीत.

नितेश राणे म्हणाले, “सरकारकडे मदत देण्याची क्षमता आणि इच्छा आहे, मात्र त्या गरजा योग्य प्रकारे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील इतर कलांसारखेच कोकणातील समृद्ध भजन परंपरेचेही जतन व संवर्धन आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत.”
महायुती सरकारला पुढील चार वर्षे ठोस काम करण्याची संधी असून या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना, सुविधा आणि कार्यशाळा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सत्तेत असणारी माणसे कार्यक्षम असून विरोधकांकडून कामात कोणताही अडथळा नसल्याने विकासाला वेग देता येईल, असे राणे म्हणाले.

“कोकणातच सांस्कृतिक मंत्री असणे हीदेखील अनुकूल बाब आहे. माझी जिद्द, इच्छाशक्ती आणि या परंपरेबद्दलची बांधिलकी लक्षात घेता भजनी कलाकारांच्या हक्कांच्या आणि न्यायाच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघेल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह. भ. प. गावंडळकर महाराज, भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला भजनी कलाकार, वारकरी व स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.


