राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत पावसाची तीव्रता वाढणार; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचा इशारा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून, व्यापक पावसासोबतच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी या काळात अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पूरप्रवण किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नये. पूराच्या परिस्थितीत बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, गरज भासल्यास स्थानिक निवारा केंद्रांचा उपयोग करावा. तसेच नदी-नाल्यांवरुन पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.

जर जीव गेला तर जबाबदारी कोणाची?

खेड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन विविध संस्थांनी आपले विविध महोत्सव एकाच वेळी जवळ जवळ ठेवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. खेड शहरात असणाऱ्या महाड नाका परिसरातील मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कार्यक्रमासाठी येणारे नागरिक आपल्या विविध वाहनांसह या ठिकाणी येतात. सध्या शहरात फेस्टिवलची क्रेझ सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला खेड वासीयांना अपेक्षित असलेला आणि जिव्हाळ्याचा फेस्टिवल दरवर्षी याच मैदानात भरतो. यंदा मात्र फेस्टिवलसह क्रीडा कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी अन्य एका संस्थेने आयोजन केले आहे. दरवर्षी पार्किंग साठी वापरण्यात येणाऱ्या जागेत यंदा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. मात्र समोरासमोर असणाऱ्या दोन्ही जागेच्या मध्ये असणारा रस्ता हा देखील अरुंद असून या ठिकाणी जाण्यास असणारा मार्गही मुख्य मार्गापासून अरुंद आहे. या कार्यक्रमादरम्यान एखादी आपत्ती उद्भवल्यास या ठिकाणी मदत कार्य पोहोचणे देखील मुश्किल होणार आहे. तसेच याच परिसरात शहरातील एकमेव कॉर्डियोलॉजिस्ट दवाखाना असल्याने अत्यंत गंभीर परिस्थितीत असणारे रुग्ण देखील या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खेड वासीयांना असणारा एकमेव आधार म्हणून या रुग्णालयाकडे पाहिलं जाते. मात्र यंदा आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे या रुग्णालयाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार यात तीळ मात्र देखील शंका नाही.

नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या या संस्था या ठिकाणी आपले महोत्सव साजरे करत असताना जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी रुग्णालयात या मार्गावरून जात असताना या ठिकाणी झालेली गर्दी व वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. खरे तर दोन्ही संघटनांनी शहरासाठी काम करत असताना सर्वप्रथम शहरवासी यांचा विचार करणे गरजेचे असताना देखील सद्यस्थितीला या संघटना व त्यांचे पदाधिकारी केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनांच्या कार्यक्रमाचा विचार करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान एखाद्या रुग्णाचा रुग्णालयात जाताना किंवा या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीआभवी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याची माहिती या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन शहरासह तालुक्यातील जनतेला द्यावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन, सर्वत्र खळबळ

नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसंच राज्यातील मंदिरंही आजपासून उघडण्यात आली आहे. मात्र अशावेळी कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पणजी (गोवा) कंट्रोल रुमला आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अखेर फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे.