कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन, सर्वत्र खळबळ

नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसंच राज्यातील मंदिरंही आजपासून उघडण्यात आली आहे. मात्र अशावेळी कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पणजी (गोवा) कंट्रोल रुमला आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अखेर फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे.

Leave a Comment